शिर्षक : रिलेशनशिप : अपेक्षा आणि प्रेम !
लेखन : पत्रकार एन.के....✍️
प्रत्येकालाच आयुष्यात प्रेम हवं असतं. प्रत्येकाच्या प्रेमाच्या संकल्पनाही वेगळ्या असतात. पण काही प्रमाणात एकमेकांशी जुळतील अशाच असतात. प्रेमात वय , रंग, रूप अनेकदा पाहिलं जातं, पण खरं प्रेम हे निष्ठेची असावी, विश्वासाची कडा असावी हे खरं. खरं तर प्रेम करणं अर्थात प्रेमात पडणं खूप सोपं आहे. पण प्रेम केल्यानंतर एकमेकांना ते नातं टिकवून ठेवणं आणि त्या नात्याची काळजी घेणं खूपच कठीण आहे. प्रेमामध्ये पैशापेक्षा किंवा कोणत्याही गिफ्ट्सपेक्षा सर्वात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे एकमेकांंना समजून घेऊन ‘वेळ’ देणे. वेळ नसेल नात्यात तूट अशी अनेक बहुतांश किस्से अनुभूती म्हणून सभोवताल पाहायला मिळतात. वास्तविक प्रेमात एकमेकांना काही प्रमाणात गृहीत धरणं योग्य आहे. प्रेम म्हटलं की अपेक्षा आल्याच. कारण कोणत्याही दोन व्यक्ती सतत त्याग करून आणि अपेक्षा न ठेवता एकत्र राहू शकत नाही. अशा गोष्टी केवळ चित्रपटांमध्ये घडत असतात. पण खऱ्या आयुष्यात तुम्हाला हे नातं टिकवायचं असेल तर काही गोष्टी आपल्या जोडीदारासाठी करणं हे ओघाने आलंच. आजच्या पिढीच प्रेम म्हणजे नकळत्या वयात चित्रपट पाहून एक स्वप्नवत जग तयार होतं आणि चित्रपटाप्रमाणेच आपली प्रेयसी वा प्रियकर असावा असं बऱ्याच जणांना वाटत असतं. पण त्याला प्रेम नाही तर अट्रॅक्शन म्हणतात. अर्थात हे सर्वांच्या बाबतीत होत नाही. बरेच जण मनापासून प्रेम करून ते अगदी शाळेपासून असलं तरीही लग्नापर्यंत नेतात आणि सुखाने संसारही करतात. पण स्वप्नात जगणं म्हणजे प्रेम नाही. प्रेम म्हणजे काळजी. प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं. एकमेकांच्या गुणदोषासह स्वीकारणं. असं असल्यानंतर अपेक्षा आल्याच आणि अपेक्षा आल्या म्हणजे त्या पूर्ण न झाल्यामुळे होणारी भांडणही आलीच. पण त्यासाठी आपल्या जोडीदाराला सतत गृहीत धरणं कितपत योग्य आहे? हा प्रश्न तुम्हाला कधी जाणवतो का? खरं तर आपणच बरोबर आणि आपला जोडीदार चुकत आहे असं मनात ठेवलं तर नातं कधीच टिकणार नाही. पण आपण किंवा आपला जोडीदार सतत गृहीत धरत असेल तर असं करणं कितपत योग्य आहे..? म्हणून अपेक्षा जस्ट अ रुल ऑफ रिलेशनशिप असावं बाकी माणूस म्हणून स्वीकारलेल्या गुण दोष सहित जपलं जावं आणि टिकलं जावं यासाठी उद्दात मनाने प्रयत्नशील असावे हे खरं. प्रेमाच्या सुरुवातीला तुम्ही जे म्हणाल ते शब्द झेलण्यासाठी तुम्ही दोघंही तयार असता. मग वर्ष निघून जाताना या छोट्या छोट्या गोष्टी आणि आनंद तुम्ही तुमच्या आयुष्यातून का काढून टाकता? सुरुवातीला तुम्हाला एकमेकांना जिंकून घ्यायचं असतं म्हणून तुम्ही कोणत्याही परिस्थितून वेळ काढून भेटत असता. मग नातं टिकवतानादेखील ही गोष्ट नंतर करणं महत्त्वाचं नाही का? वेळ दिला नाही तर तो किंवा ती समजून घेईल हे सर्वात मोठं गृहीत धरणं असतं. इथूनच सुरुवात होते ती एकमेकांना न समजून घेण्याची. दोघांमधली सामंजस्य का संपत? कुठे निघून जातात एकमेकांना समजून घ्यायचे विचार? परिस्थिती कशीही असो एकमेकांची काळजी घेणं हा प्रेमातील सर्वात महत्त्वाचा भाग. मग अगदी सकाळी उठून गुड मॉर्निंग हा साधा मेसेज करून २ मिनिटं चॅट करणं असो वा दिवसभरातून कामातून वेळ काढून तू काही खाल्लंस का किंवा तू कुठे आहेस, कशी आहेस वा काय करतेस हे विचारणं असो. अगदी इतकंही जमत नसेल तर निदान तिला वा त्याला अपेक्षा असते ती केवळ आपल्याशी बोलण्याची. तेदेखील समोरचा समजून घेईल आपण कामात आहोत हे मनात ठेवून गृहीत धरणं खूपच चुकीचं आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. बघायला गेलं तर जोड्या अशाच असतात ज्या भिन्न स्वभावाच्या असतात. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्याची ताकद हवी. पण समोरचा एकच व्यक्ती समजून घेत असेल सतत तर ते नातं फार काळ टिकणं शक्य नाही. मुलं आणि मुली दोघांनाही हे गोष्ट लक्षात ठेवायला हवी. बऱ्याचदा मुलींच्या बाबतीत हे जास्त घडताना दिसतं. मुलांच्या बाबतीत घडत नाही असं नाही. पण मुली प्रचंड प्रमाणात प्रेमात असताना मुलांची काळजी घेतात. त्यांना दिवसभरातून कितीतरी मेसेज करणं, ते कुठे आहेत, काय करत आहेत, जेवले की नाही हे सर्व प्रश्न काळजीपोटी विचारले जातात. ते कोणत्याही संंशयापोटी नसतात. पण त्या मेसेजचे रिप्लाय देण्याइतका अगदी 30 सेकंदाचाही वेळ नसावा हे नक्कीच योग्य नाही. माणूस कितीही कामात असला तरीही त्याला या गोष्टींना रिप्लाय देण्याइतका वेळ असतोच आणि अगदी नसेलच तर तो वेळ काढावा लागतो. तो किंवा ती समजून घेईल हे गृहीत धरणं काही काळापर्यंत नक्कीच तुमच्या नात्यामध्ये काम करू शकतं. पण काही वर्ष गेल्यानंतर हेच तुमच्या नात्यातील भांडणाचं मोठं कारण ठरू शकतं. कारण ज्या व्यक्तीला साधा मेसेज करून बोलायला वा रिप्लाय करायलाही वेळ नाही. त्या माणसावर आपण प्रेम केलं का असे प्रश्न पडायला सुरुवात होते. वेळ हा मुद्दा प्रेमामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो हे तुम्हाला प्रत्येकालाच माहीत आहे. तुमचा जोडीदार तुम्हाला वेळ देत नसेल आणि या गोष्टी तुम्ही सतत समजून घ्याव्या असं त्याला वाटत असेल तर त्याचं हे गृहीत धरणं नक्कीच चुकीचं आहे. कारण त्याला त्याच्या कामासाठी वेळ असतो. तो ज्या घरात राहात आहे, त्या व्यक्तींसाठी कितीही कामातून त्याला वेळ काढता येत असतो कारण त्याला घरात भांडण नको असतं. पण तुम्ही त्याला समजून घेता म्हणून सतत तुम्हाला कारण देत तुम्हाला वेळ न देणं हे कधीही योग्य नाही. नात्यात वेळ देणं आणि एकमेकांसोबत वेळ घालवणं खूप जास्त गरजेचं असतं कारण हेच क्षण असतात जे तुम्हाला अधिक जवळ आणतात. तुमच्या समोर तुमचा जोडीदार इतर गोष्टींसाठी वेळ काढताना दिसत आहे. पण तुम्ही विचारल्यानंतर जर त्याच्याकडे शंभर कारणं असतील तर तुम्ही त्याच्यापासून दूर जाण्याची वेळ आली आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं.
प्रेमाच्या नात्यातही आदर ठेवणं गरजेचं आहे. आपला जोडीदार आपल्या प्रत्येक मताचा आदर ठेवत असेल. पण आपण जर त्याचा आदर ठेवतच नसू तर त्याचं हे असं गृहीत धरणं खूपच अपमानास्पद आहे. आपला जोडीदार आपण म्हटलेली प्रत्येक गोष्ट करायला तयार असतो. पण जर आपण त्याची एकही गोष्ट ऐकली नाही तर कसं वाटेल त्याला? याचा विचारदेखील व्हायला हवा. सतत आपण कामात आहोत, मग नंतर बोलूया, नंतर करतो हे बोलणं चुकीचं आहे. कारण ज्याप्रमाणे आपला जोडीदार कामात असतो तसंच आपणही कामात असूनही त्याची काळजी घेत असतो हे त्याने लक्षात घ्यायला हवे. जोडीदाराच्या जागी एकदा स्वतःला ठेवून अशावेळी विचार करून नक्की पाहा. अगदी त्याने किंवा तिने भावना व्यक्त केल्यानंतर त्यावर योग्य प्रतिक्रिया द्यायला शिका. भरभरून समोरची व्यक्त जर तुमच्याविषयीच्या प्रेमाविषयी बोलत असेल तर तिला चुकीचं उत्तर देऊन नाराज करू नका.
धन्यवाद ! 🌺