Tuesday, 4 January 2022

व्यसन : मोबाइलचं !

 शिर्षक : व्यसन मोबाईलचं !

लेखन : पत्रकार एन.के. ( ०४ जाने २०२२ )
  


       व्यसन म्हंटल की डोळ्यासमोर अनेक मद्यजन्य पदार्थ तरळतात पण आजकाल सगळ्याच वयोगटातील लोकांचं एक मौखिक तथा आपण सर्रास म्हंटल तर एक व्यसन "मोबाईल".  एखाद्या गोष्टीच्या अति आधीन जाणे म्हणजेच व्यसनाधीन होणे.चांगले असो अगर वाईट,परंतु प्रमाण जास्त वाढले म्हणजे त्याचे रुपांतर व्यसनात झाले.मोबाईलला हात लावला म्हणून नवऱ्याने बायकोला बेदम मारले,ही बातमी टीव्हीवर पाहिली आणि या मोबाईल नावाच्या मानवचलित यंत्राने माणसाच्या जीवनात केलेल्या आगमनाने माणसाला लागलेले त्याचे व्यसन,हे नक्कीच जीव घेणे आहे,असे वाटू लागले.ज्या महापुरुषाने मोबाईलला जन्मास घातले तो धन्य. मोबाईलनं लोकांना"विनाशकाले विपरीत बुद्धी"असं झालंय.लोकांची बुद्धीसुद्धा बिथरली.अगदी वयोवृद्ध मंडळी सुद्धा याला अपवाद राहिली नाही. लोक एकवेळ पायात चप्पल घालायची विसरतील,अंगात शर्ट घालायला विसरतील,पण मोबाईल मात्र हातात किंवा खिशात असल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकण्यास धजावणार नाहीत आणि चुकून मोबाईल जर विसरला तर आयुष्याचा जोडीदार हरवल्यागत हुरहूर मनाला लागावी,एवढा प्रत्येकाला याचा लळा लागला आहे.या निर्जीव वस्तूनं माणसाला प्रमाणापेक्षा जास्त आपलंसं केलं आहे.लोकांना अन्नपाण्यापेक्षाही याचा मोह जास्त वाढू लागला आहे. मोबाईलच्या अनेक किस्से आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात जितकं चांगलं आहे तितकंच अनेक अक्षरजंजाळ असलेली ही वस्तू अनेकांच्या मदतीला नक्की येते पण घातक सुद्धा तितकीच आहे. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे नैतिक नाती, जिवंत नाती दुरावत आहेत हे तितकेच सत्य.  संपर्क आणि इतर महत्त्वाचे कामासाठी वापरले जाणाऱ्या ह्या साधनाचा अतिरेक होऊन मृत्यच्या दारात घेऊन जाणारा एक प्रवासी साधन म्हणून मोबाईल हळूहळू उदयास यायला लागला आहे अस म्हंटल तर वावग ठरणार नाही. अनेक खेळ, अनेक ऑनलाइन ठग, पब्जी सारख्या खेळामुळे अनेक घटना घडलेल्या आपण पहिल्या असतील. शेवटी एवढंच म्हणावं लागेल की मोबाईल जेवढ हवं तेवढं वापरा अतिरिक्त वापर कधी कधी माहीत नसलेल्या आजाराचं आमंत्रण ठरू नये तर मिळवलं.
मोबाईलसारख्या एवढ्या छोट्या वस्तूनं आज मानवाचा एवढा विकसित मेंदू असूनही त्यावर कब्जा मिळवला आहे.मग प्रश्न असा पडतो,की मानवाने मोबाईलला निर्माण केले,की मोबाईलने मानवाला.आपण तयार केलेल्या वस्तूच्या आपण आधीन जात असू तर आपल्या बुद्धीची वाटचाल कुठे होते आहे,हेही ध्यानी घ्यायला हवे.आपणच निर्माण केलेली वस्तू आपल्यासाठी हानिकारक ठरत आहे.या व्यसनातून बाहेर येण्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे.नाहीतर घोडामैदान समोरच आहे आणि त्याचे परिणाम अल्पावधीतच प्रत्येकाला कळणार आहेत.त्याकरिता आपला सावध पवित्रा असावा म्हणजे ही एक भविष्यात येणाऱ्या संकटांची चाहूलच आहे.मोबाईलचा गरजेपुरताच वापर करा‌.अनावश्यक फोटोज,व्हिडिओज,पोस्ट टाकणे आणि पाहणे टाळावे.विनाकारण फालतू गेम खेळत बसणेही नक्कीच धोक्याचे आहे.जवळजवळ बहुतांश व्यक्ती या व्यसनात अडकून पडल्यामुळे एक दिवस आपले स्वास्थ्य गमावून बसणार आहेत.त्याकरता वेळीच खबरदारी घ्यावी.आजपासूनच चारतास मोबाईल पाहणाऱ्यांनी दोन तास,दोन वाल्यांनी एक तास वापरावा,तर एक तास पाहणारांनी अर्ध्या तासात कसं आटोपते घेता येईल याचा प्रयत्न करावा.तरच आपण भविष्यात आनंदी आणि समाधानी जीवन जगू व इतरांनाही जगू देऊ हे निश्चित आहे.

   धन्यवाद !