Monday, 14 February 2022

व्हॅलेंटाईन डे'ज : प्रेमाचा आठवडा ( पाश्चात्य संस्कृती मधला...! )

शिर्षक: व्हॅलेंटाईन डे'ज : प्रेमाचा आठवडा ( पाश्चात्य संस्कृती मधला... )


  जगात आता प्रेमयुगल असो प्रेमाच्या माणसाला प्रेम व्यक्त करणारा आठवडा म्हणून फेब्रुवारी मधला हा पूर्ण आठवडा व्हॅलेंटाईन डे च्या नावाने प्रचलित होतोय. नवीन तरुण तरुणी असतील किंवा मनात असलेल्या प्रेमाच्या भावनेला व्यक्त करून एक प्रेमळ नात्याला जन्म घालण्याचा आठवडा म्हणून याकडे पाहिलं जातं. गिफ्ट, डेट, भेट, अमुक डे तमुक डे च्या नावाखाली आज कालचे नव्या भविष्याची चेहरे आज एक यशस्वी का अयशस्वी नात्याला हात घालत आहेत याच गणित मात्र न सुटलेल आहे. ह्या पाश्चात्य संस्कृती वर अनुकरण म्हणून भारताची एक साधारण वयोगट किंवा साधारण टक्केवारीचा गट लयास जातोय का , संस्कृती पायदळी तुडवली जात आहे का याची शास्वती मात्र अद्याप अदृश्य आहे. आज खऱ्या मनाने किंवा कुंडली आणि गोतावळा मिळून तयार केलेली नाती कित्येक कोर्टात धूळ खात पडल्या आहेत. असे असताना प्रेम ही संकल्पना खोटी का ? प्रेम म्हणून असणारी सद्भावना संपली का ? नाती आजपण खोट्या बनतात का ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र नक्की नाही असेल पण ओघाच्या काळोखात कित्येक नाती बनतात आणि मनाला ठेच लागून दुर्दैवी दुर्घटनेच्या शिकाराला बळी पडत आहेत, पडतात तेही तितके महत्वाचे. मग याचे अनुकरण करावे किंवा नाही ? किंवा कितपत योग्य आहे याची खात्री करायला ही तितकेच महत्त्वाचे आहे. जगभर आपल्याला हीर-रांझा, रोमिओ-ज्युलिएट, लैला-मजनू जोड्या प्रत्येक संस्कृतीत सापडतात. या मानवी भावनेवर कित्येक प्रेमकाव्ये, प्रेमपत्रे, नाटके जगात लिहिली गेली आहेत. हत्या-आत्महत्यासुद्धा झालेल्या आहेत. म्हणजे स्त्री-पुरुष प्रेम किंवा आकर्षण हा कुणा एका संस्कृतीचा मक्ता नाही. याचा अर्थ ही भावना बायालॉजिकल आहे. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातील या आठवड्याला आणि १४ फेब्रुवारी या दिवसाला खूप महत्त्व येऊ लागलंय. प्रेमाच्या या दिवसाने तरुणाईला वेड लावलंय असंही म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अगदी ठरवून या दिवशी कुणी प्रेमात पडत नाही, मात्र तरीही वर्षभर याची तयारी सुरू असते. मग गुलाबाची फुलं, गिफ्ट्स, भेटकार्ड, भेटवस्तू काय द्यायचा या गोंधळात तरुणाई गिफ्टशॉपमध्ये दिसतेच. खरंतर वर्षाचे ३६५ दिवस हे प्रेमाचे असतात पण व्हॅलेंटाइन डे की बात ही कुछ और है! अस म्हणत एक नवी पिढी वेगळ्या संस्कृतीला दृढ करत आहे म्हंटल तर वावग ठरणार नाही. यापेक्षा या पिढीला एक चांगल्या आणि सज्जड समज असो वा खऱ्या व्हॅलेंटाईनची ओळख करून देणे भविष्यात किंवा आता सध्याच्या काळाची गरज पालकांना आहे असे म्हणावे लागेल अन्यथा अनेक अशी कारणे, अनेक घटना, अनेक असे अनपेक्षित तात्पर्यना सामोरे जावे लागेल हे नक्की.
     आज पण आपण आपल्या पाल्याला म्हणून किंवा किशोर वयातल्या हरेक त्या कपलला आता समज देऊन अशा संस्कृतीच अनुकरण करायला बंद करायला हवं अन्यथा नको असलेल्या लाक्षणिक नात्याने अनेक कुटुंबाची डोकेदुखी वाढवू शकते. खऱ्या अर्थाने व्हॅलेंटाईन म्हणजे काय याची प्रचिती अजून कुणाला आली असेल का नाही माहीत नाही आठवडा भर तयारी इ. असणारी ही मुलं नक्की करतात काय आणि कोणत्या कल्पक गोष्टीकडे वाहिली जाताहेत याच गूढ मात्र मनात कायम असत..!
  जसे की कुणीतरी आपल्याला विशिष्ट दिवशी गिफ्ट देणं, आपणही कुणाला तरी एखादी भेट आठवण म्हणून देणं अशा संपूर्णपणे भौतिक असणाऱ्या घटकांचा सध्याच्या जगात बोलबाला दिसून येतो. भेटवस्तू देणं नक्कीच चुकीचं नाही तरीसुद्धा अशाप्रकारेच प्रेम व्यक्त केले जाते किंवा तसेच ते सिद्ध केले जावे हा अट्टाहास चुकीचा नाही का? अशा भेटवस्तू किती दिवस या भावनेला न्याय देऊ शकतील? मला वाटतं, फक्त काही दिवस किंवा फार तर त्या वस्तूचा वापर होतोय तोवरच. सतत "लव्ह यु" म्हणून जर प्रेम सिद्ध होते असा समज असेल तर तो गैरच आहे. कारण या दोन शब्दांचा फक्त आधार घेतला गेलेला असतो. खरी भावना तर यापासून कोसो दूर असलेली दिसते. "लव्ह यु" या शब्दाने जर प्रेम अबाधित रहात असते तर समाजातील शेकडो प्रेमविवाह मोडलेच नसते बरोबर ना..?
   प्रेमाचं ना टिकवायच असेल तर एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात खूप जास्त खोल प्रेमाची भावना रूजलीय तर तिची खोली तितक्याच उत्स्फुर्तपणे बाहेर उफाळून यायला हवी ना? मुळातच प्रेमाची भावना ही पवित्र आणि उदात्त अशी असल्याने तिचे महत्त्व फार उच्च आहे. तिला भौतिक गोष्टींचा आधार द्यावा लागत नाही. ती कोणत्याही नीती-मुल्यांच्या पाशात अडकणारी नाही. सामाजिक मान्यतांच्या पल्याड जाऊन ती आपले अस्तित्व टिकवून ठेवताना दिसते. तिच्यावर, त्याच्यावर किंवा आपल्या इतर कोणत्याही नात्यावर आपले खूप प्रेम आहे हे वेळोवेळी, अगदी छोट्या छोटया प्रसंगातून समोरच्याला जाणवले पाहिजे. याचा अर्थ असा नाही की, सतत आपल्या प्रिय व्यक्तीच्या संपर्कात राहिलेच पाहिजे. परंतु त्या "व्हॕलेंटाईन" असणाऱ्या व्यक्तीसाठी दिवसातला किमान वेळ तरी फक्त त्या व्यक्तीचासाठीच असायला हवा ना? आपल्या प्रिय व्यक्तीची एखादी लहानशी आवड लक्षात ठेवून ती योग्य वेळी पूर्ण केली तरी  ते समोरचे मन आनंदाने नाचू लागते.
    आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात. आपण ती लिलया सांभाळत असतो. तरीही प्रत्येकाच्या मनात एखादी "खास" अशी व्यक्ती असते तर तिला तशीच "#खास" वागणूक मिळायला हवी ना? इतरांपेक्षा थोडे जास्त महत्त्व त्या व्यक्तीला असायला हवे ना? परिस्थिती कशाही असोत, जर आपण आपल्यासाठी "खास" असणाऱ्या व्यक्तीसाठी "लव्ह यु"च्या पलिकडे जाऊन तिला जपत असू, पैसा, गिफ्ट किंवा तत्सम भौतिक गोष्टींना वगळून आपण तिच्यासाठी प्रेमभाव प्रदर्शित करत असू, त्या व्यक्तीचे मन समजून घेत असू तर ते खरे प्रेम असेल. अशा नातेसंबंधात हक्क आणि कर्तव्य यांची सहजसुंदर सांगड घातलेली असावी. मग अशा प्रेमाच्या नात्यात "लव्ह यु" आणि "हॕप्पी व्हॕलेंटाईन डे" म्हणण्याची गरजच पडणार नाही. कारण जगातील सर्वात महत्त्वाची, अमूल्य अशी गोष्ट असते ती म्हणजे आपण समोरच्या प्रिय व्यक्तीसाठी खर्च केलेली वेळ. जर ही वेळच आपण देऊ शकत नसेल तर बाकी सर्व गोष्टी गौण ठरतात.म्हणून एक सात्विक विचार घेतला तर व्हॅलेंटाईन हा आपला सण नव्हे, करायचा आहे साजरा तर कायम नात्याच्या महत्वकांक्षा बघून व्यक्त व्हा..! 
      म्हणून इतकंच सांगतो, आपल्या कोणत्याही नात्याला काही द्यायची इच्छा असेल तर आपला थोडासा वेळ, खास तिच्यासाठी, त्या माणसासाठी, त्या वस्तूसाठी, त्या नात्यासाठी राखून ठेवला तर ते नाते चमकून उठेल. प्रत्येकाने असा प्रयत्न एकदा करूनच बघा. तुम्हाला कोणतेही स्पेशल डे साजरे करण्याची गरज पडणार नाही.


  लेखन : पत्रकार एन.के.
  मोब. ८८०६६०५८५२