सर्व साधारण जीवनाच्या जडणघडण मध्ये अनेक प्रकारची माणसं असतात. प्रत्येक माणसाच्या जीवनशैलीत प्रत्येकाची काही ना काही अडचण, दुखाच एक क्षणिक का होईना पण एखादी किनार असतेच. काही महिन्यापूर्वी एका ठिकाणी मित्रा समवेत एक कार्यक्रमात जाण्याचा योग आला. आमच्यात मनसोक्त गप्पा रंगल्या . सगळ्यांची वेगळी कहाणी . कुणाला या कॉलेजात त्या कॉलेजात अॅडमिशन मिळेल का ही चिंता , कुणी नोकरीत पगारवाढ झाली नाही म्हणून हिरमुसलेलं होतं . तर कुणाला या वर्षी तरी पोस्ट काढायची होती . कुणाला परदेशात एमएसला प्रवेश हवा होता आणि कुणाकुणाला विशिष्ट वयापर्यंत सेटल व्हायचं होतं . असे सगळ्यांचे प्लॅन तयार होते . सर्व एकमेकांसोबत शेअर करत होते . तेव्हा असंच आमच्या गप्पा मधून एक कटाक्ष टाकलं तर एक आजी - आजोबा यांचं जोडपं आम्हा मुलांच्या घोळक्याशेजारी बसले होते . आमच्या मोठ्या आवाजातल्या गप्पा त्या आजी - आजोबांना ऐकु जातच होत्या बहुतेक. काही वेळानंतर त्या आजोबांनी आमची चौकशी केली . कोण कुठलंय , कुठून आलोय , काय करतोय याची माहिती विचारली . आणि त्यानंतर हळच म्हणाले । " माझाही नातू तुमच्या वयाचा आहे . आता हट्टाने रशियाला डॉक्टर व्हायला गेला आहे . तुमच्या पिढीकडे पाहून वाटतं ,
तुमच्याइतकं नियोजन आम्ही कधी केलं नाही . ते बरंही होतं . तेव्हा स्पर्धाही नव्हती . तुम्हाला तुमची ठिकाणं माहीत आहेत हे चांगलंच आहे . तरी लक्षात ठेवा , आयुष्याच्या प्रवासाला गुगल मॅप नसतो . " आम्ही थिजलो . विचारात पडलो . आजोबांचं हे वाक्य अनुभवाचं होतं . कारण स्थिर - अस्थिर असे दोन्ही तट आजोबांनी अनुभवले होते . त्यामुळेच पटणारं होतं. आयुष्याचा प्रवास सुरू होतो तो पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत . पण रोजच्या धावपळीत काहीतरी निमित्ताने प्रवास करतच असतो . गच्च भरलेल्या शहरात , खच्चन भरलेल्या बसच्या गर्दीत , सिग्नलवर वाट बघत , स्टेशनवर ताटकळत , लोंबकळत प्रवास हा चालच असतो . कधी स्वतःच्या वाहनाने ट्रॅफिकच्या गर्दीतही रेडिओ ऐकत स्टिअरिंग फिरवत , दुचाकीवर स्वार होत क्लच , ब्रेक ऍकसिलेटर आणि गिअर बदलत आपला प्रवास चालूच असतो अखंडपणे . मात्र भरलेल्या शहरात , गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या रस्त्यावर एक गुगल मॅप सतत आपल्या मदतीला असतो . अनोळखी ठिकाणी पोहोचवण्यासाठी . हा गुगल मॅप इच्छित स्थळ शोधून द्यायला आणि रस्ता दाखवायला तत्परच असतो . पण आयुष्याचं असं नाही ना ? अमुक एक ठिकाण आपल्यापासून किती दूर आहे हे वेळ आणि अंतर यासह गुगल मॅपला अचूकतेनं सांगता येत असलं तरी आपण पाहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी लागू शकणारा वेळ आयुष्याच्या प्रवासात कधी समजतो का ? अर्थात नाही . रस्त्यावरच्या प्रवासात ट्रॅफिक सिग्नलवर काही निश्चित सेकंद थांबून कूच करता येते .
अगदी सहज आणि निष्ठेने सांगायचं झाल तर आयुष्यात अनेक पर्वावर आपल्याला यश अपयश मिळत राहत पण कधी कधी आपल्याला हवं असत ते ध्येयवादी रस्ता मिळत नाही तर कधी कधी आपल्याला नको असलेल्या मॅप वर आपण येऊन ठेपतो. अर्थातच सगळ्याच गोष्टी आपल्याला गुगल वर मिळतात असे नाही. माणसाची तमा किंवा अपेक्षा विचारात घेतल्या तर ७०% गोष्टी ह्या माणसाच्या आचरण आणि वागणुकीच्या लेखा-जोखावर मिळतात, म्हणून का होईना साधं आणि सोप्प जीवन जगायला सुरू करा त्यामुळे आपल्याला हवं नको ते नक्की आयुष्यात मिळत राहील हे नक्की. आयुष्याच्या प्रवासात सहनशीलतेने खूप वेळ वाट बघायला लागू शकते . त्यासाठी लागणारी वेळ आणि अंतर कुणालाच ठाऊक नसतं . ही प्रतीक्षा न संपणारी असू शकते . पण हरकत काय ? एक दिवस बस नाही मिळाली आपण रिक्षा , टॅक्सी घेतो , तर कधी पर्यायी रस्ता निवडून इच्छित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करतो तसंच कायम प्राप्त परिस्थितीत पर्यायांच्या शोधात राहायचं . जरा विसावायचं आणि पुढे जायचं . . जरा नजर बदलली की प्रवास सुंदर होतो.
लेखन : पत्रकार एन.के.- 8806605852
No comments:
Post a Comment