Sunday, 7 June 2020

बायको... एक जीवनसाथी !!

शिर्षक - बायको : त्यागाची मशाल, घर संस्कृतीचा कणा...!

लेखन - पत्रकार एन.के. ( 8806605852)

      ... [ स्त्री बद्दल खुपदा लिहलं, त्याच्या परिस्थितीबद्दल किंवा अनपेक्षित तिच्या जडण घडण बाबत काहीस लिहलं मी नक्कीच पण 'बायको' नामक असणाऱ्या त्यागाच्या रणरागिणी बद्दल आज काही शब्दांकन करण्याचा मूड होता, प्रत्येक घरात एक जोडपं असतं, प्रत्येक  पुरुषाच्या आयुष्यात ; जिवनात बायको नावाचं एक चाक असत. हे चाक नवरा, मुल-बाळ, संसार, संस्कृती, वडीलधाऱ्या पासून प्रत्येकाच्या सुख: दुखात स्वतः कडे दुर्लक्ष करून घरासाठी त्याग प्रतिमा स्वतः मध्ये जागृत करून संस्कारी रुळावर कायम झटणारी रणरागिणी बद्दल आज चार शब्द विशद करतोय. विवाहित, अविवाहित अशा आणि बायको बद्दल वाचनिय मन असणाऱ्या सर्वांसाठी आजचा हा लेख अर्पण करत आहे. ]
                           

      नवरा बायको, म्हणतात ना एका संसार रुपी रथाची दोन चाके आहेत. खरंच आहे ते. नविन लग्न झाल्यावरचा तो हवाहवासा वाटणारा एकमेकांचा प्रेमळ सहवास. त्याने केलेलं तिचं कोतुक, मग ते जेवण बनवण्यावरुन असो किंवा तिच्या दिसण्यावरुन. त्यावर तिचं लाजणं. प्रत्येक गोष्टीचा दोघांचा पहिला अनुभव न विसरता येणारा. किती गोड असतात ते दिवस. या नात्यात वेगळाच गोडवा असतो. नविन घरात तोच एक अगदी जवळचा, हक्काचा वाटतो. आयुष्यात त्याच्या असल्यानं किती सुरक्षित वाटत असतं. तिचं सगळं विश्व त्याच्या अवतीभवती असतं. एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी समजून घेणं, त्यात साम्य असले तर होणारा तो आनंद. जीवनातील सुंदर अनुभव असतो तो.
       'ही बायको नसती तर'  ह्या विषयावर निबंध लिहायची वेळ आली तर कदाचित शंभर पानी वही पण कमी पडेल तुम्हाला. खरंच खूप काही लिहावं लागेल हो. हीच्याशीच लग्न जमवण्यासाठी केलेली खटपट, लग्न जमल्यानंतरच्या भेटी गाठी, तिचा रागवा रुसवा, लाडाने तिची केलेली मनधरणी, लग्नासाठी तिच्या आवडी निवडी पाहून केली खरेदी, तिच्या येण्यासाठी आतुरलेले तुमचे घर, तिला आवडणाऱ्या रंगसंगतीचे पडदे, तुमच्या बजेट च्या पलीकडे जाऊनहि निवडलेले तिच्या आवडीचे हनिमून डेस्टिनेशन हे सगळं नक्कीच आठवेल बघा. घराची जमवाजमव करताना तिची पसंद, आपल्या घरच्यांना लावलेला लळा, आपलया मित्रमंडळींच्या आग्रहाखातर तिने बनवलेल्या काही खास पाककृती, अगदी तुमच्या कपड्यांमध्ये, केसांच्या ठेवणीमध्ये झालेला फरक, तुमच्या खाण्यापिण्याचे सांभाळलेले चोचले हे तर नोंदवावे लागतीलच त्या वहीत. कामावरून आल्यानंतर तुमच्या कानात सांगितलेली  ती गोड़ बातमी,  तुमच्या घरात येणाऱ्या  नवीन पाहुण्यासाठी केलेली जय्यत ती तयारी आणि तो आल्यानंतर त्याच्याकडे  पाहणारी तिची कैवल्यपूर्ण नजर, ते बाळ मोठ होत असताना त्याच्याकडे वटारलेले डोळे आणि तुमच्या त्या राजपुत्राने मिळवलेल्या भव्य यशानंतर तिच्या डोळ्यातले ते कृतार्थ भाव पण तर लिहावे लागतील त्या निबंधात. प्रपंच वाढताना केलेल्या परिश्रमांची आणि तडजोडींची मोजदाद तर ठेवलीच असेल तुम्ही .. नवीन घराच्या साठी दागिने दिले असतील तिने डोळ्यातले पाणी लपवत, लेकाला अमेरिकेला पाठवताना राहिल्या असतील अनेक पैठण्या दुकानाच्या शोकेसमध्येच, तिच्या आईसाठी नसेल पण तिच्या रक्ताचं नातं नसलेल्या तुमच्या आईसाठी तर नक्कीच जागली असेल अनेक रात्री हॉस्पिटलच्या बाकड्यावर... जागा आहे ना वहीत ..खूप लिहावं लागेल अजून. हळूहळू जबाबदारी दिसू लागते. एकमेकांच्या सवयी आवडेलच याची खात्री नसते, मग सुरू होते तू तू मी मी पण तरीही तू आणि मी. एकमेकांकडून नकळत अपेक्षा वाढतात, पूर्ण होत नसेल तर चिडचिड होते. पण प्रेम मात्र कमी होत नसते. दोघांच्या भांडणात, रुसवा फुगवा दूर करण्यात एक मज्जाच असते. मग अवतरतो भाग दोन म्हणजे की ह्या नात्यातली ती बायको नावाची स्त्री अर्थातच नात्यातील एक बंध सोडून तुमच्या कडे आली असते. मग संसार म्हटलं की मग सुरु होतो तो एक असा प्रवास की भांडण झाले की समजूत काढायची जबाबदारी त्याचीच असते. हळूहळू मुलांच्या येण्याने एक वेगळाच आनंद, प्रेम दोघांमध्ये असतं. मुलांचे संगोपन करण्यात, घर, नोकरी सांभाळण्यात ती खूप थकून जाते पण तिचे कष्ट बघून त्याने प्रेमाने मिठी मारली की ती सगळं विसरून जाते. आई म्हणून संस्कार, मुलांची देखरेख ती करत असेल तरी त्यांच्या भविष्याची काळजी त्याला असतेच. त्यासाठी कुठे गुंतवणूक करावी, घरखर्च, बायको मुलांची हौसमौज करत तो सगळा गाडा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असतो. दोघांनी एकमेकांना ‌समजून घेणं, प्रेम, विश्वास जपणं तितकंच महत्त्वाचं असतं. खुप गोड असं हे दोघांचं नातं असतं. या सगळ्यात दोघांचं नातं घट्ट होत जातं, प्रेम वाढतच असतं. दोघांनीही एकमेकांची खुप सवय झाली असते. दोघांचे एक सुंदर नाते निर्माण झालेले असते. त्याच्याशिवाय ती आणि तिच्याशिवाय तो अपूर्णच असतात. दोघांनीही समजून घेवुन विश्र्वासानं हे नाजूक जन्मभराचं नातं जपण्याची गरज असते. जसजसे वय वाढत जाते, मुले मोठी होतात तसतशी एकमेकांची जास्त गरज भासू लागते. संसाराचा गाडा सुरळीत चालवायला खरंच दोघांचीही गरज असते.
जाता जाता एवढंच की आठवून बघा.. अनेक लग्नसमारंभांना गेला असाल ना तुम्ही दोघे. मित्रांच्या कोंडाळ्यात बसून पहिले असेल तुम्ही तिला रुखवताकडे पाहताना. कशी वेगळीच दिसत होती हो ती. किती प्रेमाने सांगत होती सगळ्यांना तुम्ही भेट दिलेल्या त्या साडीबद्दल. साधी मोत्याची माळ तर घातली होती तिने पण सगळ्या गर्दीत आज कशी उठून दिसत होती. श्रावणातल्या घरच्या सत्यनारायणाच्या पूजेत तुमच्या बाजूला बसून पदर डोक्यावर घेऊन तुळशीची ची पाने वाहताना तुमच्या हाताला केलेला स्पर्श आठवतो का...झर्र्कन एक वीज स्पर्शून गेल्यासारखा. गाडीच्या प्रवासात न विसरता थर्मासमध्ये भरून घेतलेला तुमच्या आवडीचा मसालेदार चहा तुम्हाला भरून देताना किती कौतुकाने पाहत हॊतात हो तुम्ही तिच्याकडे. तुमची पहिली स्कुटर घेतली तेव्हा मागे बसून थोडीशी तुमच्यावर रेलून, तुमच्या उजव्या खांद्यावर हळुवार हात ठेऊन तुम्ही स्कुटर चालवताना छान दिसता हे सांगणारी हीच तर होती ... काही पाने या गुलाबी आठवणींने माझ्या माध्यमातून तुमच्या पर्यंत मला पोहचवता आल्या हे भाग्य...
एक कविता वाचायला मिळाली त्यातले १-२ कडवे लिहतो न समारोप करतो...
:- नवराही खरंच खपतो
करून मेहनत नोकरी धंदा
पण घरचं व्यवस्थापन
नसेल तर होतो मोठा वांदा
करा कल्पना बायकोशिवाय सहल आणि सणावारांची
म्हणून वाटतं,
संसारात ७५% भागिदारी बायकोची...

नवरा काय करतो,
ते बायकोने दाखवलय करून
नवऱ्यानेही द्यावं आता आपलं कसब दाखवून
चार चाकाच्या गाडीचीही, फिरतात दोन मागची
म्हणून वाटतं,
संसारात ७५% भागिदारी बायकोची...

स्त्री-पुरूष समानतेच्या
राहिल्यात नुसत्याच गप्पा
बायको जरा काही बोलली
तर नवरा होतो खप्पा
बायको या संस्थेने गाठलीय
सगळीकडे नवीन उंची
म्हणून वाटतं,
संसारात ७५% भागिदारी बायकोची !

लेख खूप मोठा झाला अजून लिहिण्यासारख खूप काही आहे पण आता एवढ्यावर समारोप करतो. धन्यवाद !!

No comments:

Post a Comment