Friday, 30 March 2018

शिक्षक : समाजाचा एक वैचारिक भक्कम पाया

गर्व से कहो हम शिक्षक है; जगाच्या पाठीवरच्या सगळ्या पदाचा पाया अन सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या यशस्वी जीवनाचा शिल्पकार

【 आज आपण ज्या ज्या ठिकाणी आहोत आपल्या वर्तमान व भविष्याच्या प्रवासात प्रत्येकाने अनुभवलेल्या व अनुभवत असलेल्या गुरुजींच्या आठवणींना उजाळा देण्याच्या प्रयत्नाचे ४ ओळी...】

लेखन :- एन.के. (पत्रकार)
दि. :- २५/०३/२०१८

`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`

शिक्षक म्हणजे गुरु, शिक्षक म्हणजे मार्गदर्शक, शिक्षक म्हणजे शिक्षणाच्या कुटुंबातला कुटुंब प्रमुख ; शिक्षकांबद्दल लिहण्या इतपत मी ज्ञानी नाही पण ज्या कष्टाच्या घामामुळं आज मी आहे त्याच्याबद्दल थोडस लिहितोय. आज समाजातील कोणत्याही म्हणजे सर्वच क्षेत्रातील यशस्वी लोकांच्या पाठीमाग गुरु न वाटाड्या म्हणून काम बजावणाऱ्याच्या यादीत शिक्षकांचा नंबर पहिला असतो. शिक्षकांच्या असण्या पेक्षा त्याच्या कर्तुत्वाला मान मोठा आहे गरीबातल्या गरीब मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्याचा असणारा जीवाचा आटापिटा हा नेहमी उल्लेखनिय असतो. शिक्षकांचा दिनक्रम हा नेहमी एखाद्या पिढीच्या कार्यप्रणालीला सक्षम आणि भक्कम बनवणारी असते समाजात शिक्षकाला आमूलाग्र महत्व आहे पण आजच्या खासगी करणाच्या छायेत आणि पाल्याच्या पाठीवरच्या ओझे प्रमाणे शिक्षकांच्या जबाबदाऱ्या सुद्धा अवजड झालेत. शिक्षकांच्या ट्रेनिंग असो किंवा कोणत्याही प्रशिक्षण असो या माध्यमातून त्यांच्यावर प्लस मध्ये कष्ट याला संक्षिप्त जबाबदारीची झोड अधिकच उगारली जात आहे. त्यांचे प्रश्न आणि व्यथा आज राजकारणी आपल्या पायाखाली रोजरास पायाखाली तुडवताना दिसत आहे शिक्षक म्हणजे काय हे प्रत्येकाला आत्मपरीक्षण कणाऱ्याची वेळ येऊन ठेपली आहे. सामान्यतः
शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात.
शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो.
आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी‍ आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फक्त ५ सप्टेंबरला शिक्षक बद्दल बोललं जातं आणि त्याच्या स्तुतीचे सुमने उधळले जातात पण इतर वेळी शिक्षक आणि त्यांच्या कार्याचा सन्मान मात्र कमी प्रमाणातच होताना दिसतो.
आज शिक्षकाकडे पाहिलं तर अनेक अटी आणि शाळा बाह्य कामाच्या व्यापात बुडालेला माझा गुरुजी आज थकलाय. शिक्षकाला उपमा देताना कधी कुणाच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च तो असतो तर एखाद्याच्या अंगातली कला ओळखून त्या क्षेत्रात त्याला पारंगत करणारा तो कोच असतो. पूर्वीच्या काळात शिक्षकाला खुप मानायचे शाळा आणि शाळेच्या शिक्षण व्यतिरिक्त इतर समाजात राहण्याचे ज्ञान, शारीरिक शिक्षण अशा अनेक गोष्टींना शाळेत उजाळा व्हायचा आणि यातून भावी पिढी घडायची. घडलेली पिढी हि ज्ञानाच्या सागराचा भाग असायची. पण आज शिक्षकाला म्होरक्या म्हणून पालक झाला आहे सवय आणि शिस्तीच्या कक्षेत पाल्याला बसवताना केलेल्या वळण रुपी समज ला आज समाज शिक्षकांची दादागिरी समजून काहीवेळा शिक्षकांनाच समज दिला जातो. आज अनेक खाजगी शाळा आणि संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची दारे खुली झाली व शिक्षकाला ज्या पद्धतीने स्वातंत्र्य मिळायला हवा तितकं मिळत का...? ना डॉक्टर ना इंजि. ना इतर होता आलं नाही म्हणून तो शिक्षक झाला नसतो तर त्याच्या अंगीकृत बळ आणि ज्ञानाच्या जोरावर पिढीच्या निर्मात्याची स्वप्न लपलेली असतात आणि आपण आपल्या पोटच्या गोळ्याला सांभाळायला घाम पुसतो तिथं ७०-८० मुलांना एकदाच ज्ञानाची पुंजी हा शिक्षक देत असतो. कधी गरिबांच्या मुलांचा परीक्षा फी होतो तर कधी वस्त्या व वाड्यापर्यंत सोडणारा वाटाड्या बनतो, ग्रामीण भागात आई वडील ऊस तोडीला गेल्यावर त्या मुलाच्या आई वडिलांची भूमिका सुद्धा पार पाडताना मागे न हटणारा शिक्षक. आज दिव्यांग संस्था, मूकबधिर, आणि आश्रम शाळा अशा अनेक शाळेत त्या मुलावर समाजात कसं राहायचं आणि स्वतःच्या शरीराने दिव्यांग असून बुद्धीने दिव्यांग नाही अन समाजात आपण काहीतरी करू शकतो असे सांगणारा फक्त आणि फक्त शिक्षक असतो आज आपल्या समोर एखाद्या अधिकारी किंवा कोणत्या ना कोणत्या माणसासोबत रोज भेटतो बोलतो त्या माणसाच्या पाठीमाग पाहताना आदर्श आणि मार्गदर्शनाच्या मूर्तीला जाणून घ्यायचं असेल तर १ क्रं. ला नाव असेल न ते म्हणजे शिक्षक. अशा शिक्षकाला आज शासन किंवा अन्य मार्गातून खासगीकरण करण्याच्या हेतूने शाळा आणि पाल्याच्या भवितव्याच्या चुराडा करणाऱ्या प्रक्रियेला जोड्याने हणाले तरी कमीच. जरा कधी शिक्षकांच्या भूत-भविष्य-वर्तमान ला आठवून किंवा डोळ्या समोर आणून बघा एखाद्या भयाण वस्तीवरची शाळा आठवा आणि तिथं शिकवणाऱ्या शिक्षकांच्या जबाबदाऱ्या लक्षात घ्या त्या पाल्यांच्या जबाबदाऱ्या लक्षात घ्या अशा अनेक परिस्थितीत शिक्षक हा आपल्या मनाच्या बुद्धी तत्वाने योगदान देत समाज घडवत असतो.
खरा शिक्षक म्हणजे कोण याची व्याख्या करताना मुलांमध्ये सदैव रमणारे साने गुरूजी म्हणतात - *जो मुलांना पावसात भिजायला शिकवतो, आकाशाशी दोस्ती करायला शिकवितो तो खरा शिक्षक.*
आज प्रत्येक खेडी न वाड्या वस्त्यावर असणाऱ्या शाळा यावर आणि अनेक ठिकाणी असलेल्या शाळेच्या प्रायोगिक तत्वावर असलेल्या शिक्षकांच्या मानेवर अनेक शासकीय आणि राजकीय सांगड निर्माण करून टांगती तलवार बांधली गेली आहे.
खरं तर शैक्षणिक क्रांती घडवून आणणार्‍या अनेक शिक्षणतज्ज्ञांची, विचारवंतांची, तत्त्वज्ञानींची ही भारतभूमी! प्रतिकूल परिस्थितीत माळरानावर शिक्षणाचे वृक्षारोपण करून अनेक प्रज्ञावंत विद्यार्थी समाजाला देणारे कर्मवीर! स्त्री आणि दलितांच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटणारे फुले आणि आंबेडकर! समाजाला आपल्या प्रखर विचाराने जागे करणारे टिळक, आगरकर आणि रानडे! श्रमाधिष्ठित शिक्षण पद्धतीचा अवलंब करणारे म. गांधी आणि साने गुरुजी! गुरुची ओळख स्वत:च्या कर्तृत्वाने सिद्ध करणारे विवेकानंद आणि अब्दुल कलाम! अशा सर्व संपन्न महापुरुष व शिक्षण आणि ज्ञान म्हणजे काय याचे सक्षम गुढी उभारणाऱ्या या भारतभूमीत आज शिक्षकाला सोसाव्या लागणाऱ्या हाल-अपेष्टा नक्कीच लाजिरवण्या आहेत. कोणतेही क्षेत्र असो किंवा कोणतेही माध्यम असो शिक्षक आपल्या पाल्याला त्यात पारंगत करण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. अशा शिक्षकांच्या माध्यमातून सुसंस्कार आणि समाजात वागण्याची कला आज प्रत्येकाच्या अंगी अवगत असते.
डिजिटल इंडिया च्या नावाने तंत्रज्ञान झपाटय़ाने बदलत आहे. आधीचे साधे वर्ग आज ई-लर्निग रूम झालेले आहेत. काळ्या फळ्यावर पांढर्‍या खडूने लिहिलेल्या शिक्षकांच्या वळणदार अक्षरांऐवजी टेबलावरील संगणकावर किंवा भिंतीवरील स्क्रीनवर वेगवेगळ्या फाँटमधील वेगवेगळ्या स्टाइलची रंगीत डिजिटल अक्षरे चमकताना दिसतात. हा काळ संक्रमणाचा आहे. त्यामुळे शैक्षणिक पद्धतीत झालेले बदल, वाढणारा कामाचा व्याप शिक्षकांना त्रासदायक वाटत असला तरी हा बदल आपल्याला स्वीकारावाच लागणार आहे आणि तोही सकारात्मकदृष्टीने! या प्रयत्नातून शिक्षक आपल्या पाल्याला सर्वतो परीने सक्षम करत असतो. पण मतदान किंवा मतदार नोंदणी सारखे शाळा बाह्य कामात माझ्या गुरुजींच काय काम वो...? अशा शाळाबाह्य कामात गुंतवणे कितपत योग्य आहे...? सरकारी काम करायला माझा गुरुजी पण माझ्या गुरुजींच्या अपेक्षा आणि मागण्या मान्य करायला का नाही हे सरकार...?
शिक्षक म्हणजे काय म्हणून अनेक वेळा समाजपुढं प्रश्न निर्माण होतो पण त्यांच्या नजरेत एकच व्याख्या असते पुस्तकी ज्ञान देणारा एक व्यक्ती परंतु शाळेच्या त्या पटांगणात आपल्याला पाल्याला पाठवल्यावर आर्थिक आणि वयक्तिक गरजांच्या भुकेल्या ते सक्षम आणि परिपूर्ण कुटुंबातले सर्व प्रकारचे पाल्य शिकायला असतात अशा वेळी प्रत्येकाला समान आणि एकच ज्ञान अर्जना करून समाज एकसंघ घडवण्याची हिंमत आणि ताकद रुपी धाडस फक्त आणि फक्त शिक्षकांच्या अंगीकृत असत. कधी गरिबांच्या मुलांचा परीक्षा फी तर कधी गरजूच्या वहीचा साथीदार पेन पासून त्याच्या सर्व गरजा पूर्ण करणारा एक प्रकारचा आई बाप म्हणजे शिक्षक असतो. अनेक अनाथ आश्रमात ज्यांना आश्रय नसत त्यावेळी हवं नको ते त्यांच्या आयुष्याच्या यशस्वी पावलापर्यंत पोहचण्या करीता शिक्षक हा एकमेव साधन आई वडील ते भाऊ बहीण ते मार्गदर्शक पासून जगातल्या सगळ्या गोष्टींचा गाईड म्हणून शिक्षक काम करत असतो. त्यांच्या कार्याचा सन्मान आणि कौतुक करायला आज सध्या वर्तमान पत्रात सुद्धा जागा दिसत नाही. सामान्यातल्या सामान्य वाड्या ते वस्तीवर आज ज्ञान गंगा नेट असताना युद्ध पलीकडचे कसरत आज शिक्षकांच्या पदरात पडतात जिथं शासकीय योजना आणि हातभार पोहचायला वर्षे लागतात अशा ठिकाणी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर समाजासाठी कायम मनगट भक्कम करणाऱ्या शिक्षकाला मनोमन नमन. असच एका व्याख्यात्याचे व्याख्यान ऐकत होतो त्यात सांगितलेल्या भावस्पर्शी उल्लेखाने चक्क डोळ्यात पाणी तरळले आणि शिक्षकांबद्दल मनात असलेली इमेज सुद्धा बोल्ड (ठळक) झाली. "सातारा जिल्ह्यात एका शाळेत एका व्याख्यात्याचे व्याख्यान चालू होते व्याख्यानाचे कार्यक्रम ३ दिवशीय असल्याने व्याख्यात्याचे प्रभुत्वात सगळे मग्न होते आणि कार्यक्रमाच्या आयोजन आणि संयोजनात समस्त कर्मचारी व प्राध्यापक व्यस्त होते. कार्यक्रमाला नेहमी प्रमाणे दुसरा दिवस उजाडला भरगच्च भरलेलं सभागृह आणि विद्यार्थी न पालक सर्वांनीच कार्यक्रमाला प्रतिसादात्मक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती व्याख्याते सदर दिवसाच्या व्याख्यानाला सुरवात करण्यासाठी शाळेच्या गेटमधून प्रवेश केला आणि सर्वांच्या घोळक्यातून जात असताना शाळेच्या एका झाडामागून एक लहान मुलांचा आवाज आला आवाज जरासं रडवेला होता "साहेब...वो साहेब इथं हंकारे सर साहेब कोण आहेत...?" सदर व्याख्याते स्तब्ध उभे राहिले आणि हृदयाची चाळण झाल्यासारखं हृदय आवाजाने पिळवटून टाकलं व्याख्यात्यानी माग वळून पाहिलं आणि त्या मुलाला पुढं येण्याची विनंती केली "व्याख्याते- बोल ना बाळा काय झालं हंकारे सरांना का विचारत आहेस...?" डोळे हाताच्या मनगटाला पुसत मुलगा म्हणाला "साहेब हंकारे सरांना मला भेटायचं आहे....", "व्याख्याते- का भेटायच आहे बाळा...? आणि का रडतोयस तू...", "मुलगा- हंकारे सर सांगलीचे आहेत म्हणून मला भेटायचं आहे".... * "व्याख्याते - होय हंकारे सर सांगलीचेच आहेत बोल ना काय झालं (दोन्ही मनगटाला धरून आत्मीयतेने) सांग ना काय झालं मीच आहे हंकारे सर...", मुलगा सरांच्या गळ्याला पडून ढसा ढसा रडु लागला आणि म्हणाला "साहेब माझी आई सांगलीला उसतोडीला गेलीय खूप दिवस झालं मी तिला भेटलो नाही म्हणून बोर्ड वर वाचलं सांगलीचे हंकारे सर म्हणून मला सरांना भेटायचं आहे....", "व्याख्याते- बोल ना मग काय झालं भेटायचं आहे का तुला भेटवेन तुला आणि काय झालं आई वडिलांनी तुला सांगून गेले असतील ना...?", "मुलगा- नाही साहेब मला घेऊन जाणार होते म्हणून मी आईला मिठी मारून झोपलो होतो आणि मिठी केव्हा सैल झाली कळलं नाही सकाळी बघतो तर कोण नव्हतं घरी शेजारच्या काकूंनी सांगितलं की सरांच्या घरी राव्हा असं आईनं सांगितलं आहे..." : *"व्याख्याते मा.प्रा. हंकारे सरांनी त्या मुलाला आर्थिक पासून ते आई वडिलांच्या भेटी घडवून आणले याच तात्पर्य इतकंच कि अशा अनेक पाल्यांच्या जीवनात आई-वडील आणि काही वेळा सर्वस्व म्हणून पद भूषवणाऱ्या शिक्षकांच्या या कार्याचा नक्कीच मन भरून कौतुक आणि सन्मान डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही..."* या उदाहरण बरोबर सरांनी आपल्या व्याख्यानात असच एका मुख्याध्यापकाची कार्य नमूद करताना म्हणतात... एक मुलगा एका शाळेच्या बाहेर एका कट्ट्यावर रोज बसायचा शाळा भरली कि यायचा शिकायचा आणि परत शाळा सुटली कि त्या कट्ट्यावर जाऊन बसायचा.. एकदा सरांनी त्याला विचारलं की का रे इथं का बसतोस घरी जायचं नाही का...? "मुलगा- सर त्या झोपडीत माझी आई राहते" , "सर- मग काय झालं जा ना...", "मुलगा- सर त्या झोपडीत माझी आई राहते पण माझा बाप नाही तिथं..." (मुलाच्या डोळ्यात अश्रू आले), "सर-मग काय झालं वडील कोठे आहेत...?" , "मुलगा-सर माझे वडील देवाघरी गेले आहेत...", "सर- मग आई आहे ना जा....", "मुलगा- नाही सर तिथं एका माणसासोबत माझी आई राहते पण तो माणूस मला आवडत नाही मला बघितला कि आईला आणि मला सुद्धा मारतो... (मुलगा ढसा ढसा रडायला लागतो) म्हणून मी शाळेच्या दिवसात तो नसला कि आई कडे जाऊन येतो कारण तो सोमवार ते शनिवार कामाला जातो त्या वेळेत मी आईकडे जाऊन येतो...", "सर - मग रविवारी...?", "मुलगा-साहेब रविवारच नाव काढू नका, रविवार मला आवडत नाही रविवारी त्या माणसाला सुट्टी असते आणि दिवस भर तो घरात असतो...", "सर-मग रविवारी कुठं राहतोस, काय करतोस...?" त्या मुलाच्या या उत्तराने डोळे पणावल्याशिवाय राहणार नाहीत... *"मुलगा - सर रविवारी मुख्याध्यापकांच्या घरी राहतो सर..."* , या प्रमाणे शिक्षक आणि पाल्य यांच्या या संबंधाला आपण काय नाव देणार ? त्यांचं कार्य हे नेहमी समाजच नाही तर प्रत्येकाच्या मनाच्या अंतःकरण समक्ष समजून घेण्याइतपत महान कार्य म्हणूनच गणले गेले पाहिजे...!

खूप काही लिहाण्यासारखं आहे शब्द सुद्धा संपून जातात आयुष्यात आल्यावर किंवा आपल्या गरजा पूर्ण करत असताना आपल्याला स्पर्धेच्या युगाची ओळख, स्पर्धेत टिकण्यासाठी कोच किंवा जगात वावरताना आपल्याला हवे असलेल्या वर्तमान आणि भविष्यक ज्ञान देणारा जमिनीवरचा खरा भगवंत म्हणून आज शिक्षक भूमिका बजावत आहे....अशा सर्व शिक्षकांना माझा मनापासून दंडवत...!

"माँ -बाप की मूरत है गुरु,इस कलयुग में भगवान की सूरत है गुरु"

धन्यवाद...!

No comments:

Post a Comment